Latest Blog Posts

...

11-Jul-2023

व्यसन इंटरनेटचं

          व्यसनाधिनता म्हटलं कि आपल्या नजरेसमोर येते दारू, तंबाखू ,सिगारेट इ . पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तंत्रज्ञानाच्या या युगात आता अशा काही व्यसनाधीनतेची ओळख होत आहे , जे काही व्यक्ती आपल्या वर्तनातून दाखवत आहेत. जसे कि सगळ्यात कॉमन म्हणजे मोबाइल, सोशल मीडिया, विडिओ गेम्स, पोर्नोग्राफी ,इ. गोष्टींचे व्यसन. यांना व्यसन हा शब्दप्रयोग करणं म्हणजे थोडं रिस्कीच. कारण, आपल्यापैकी बहुतांशी सगळेच कमी - अधिक प्रमाणात हे वर्तन दाखवत असतात. पण काही टक्के लोकांना या गोष्टींची इतकी सवय लागते कि त्यापासून स्वतःला दूर ठेवायचं सोडाच पण विचार सुद्धा करू शकत नाहीत आणि आयुष्यातील मानसिक, शैक्षणिक, आर्थिक, कौटुंबिक, इ. क्षेत्रात अशा वर्तनामुळे नुकसान होऊन सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अशा व्यसनाधीनतेचे अजून काही लक्षण आहेत जसे कि या व्यक्तींना मोबाईल किंवा इंटरनेट नाही मिळाल्यास राग ,चिडचिड, अस्वस्थपणा, नैराश्य, चिंता या सारख्या मानसिक स्थितीला सामोरे जावे लागते. याला 'वियोग लक्षणे' असे म्हणतात.  या व्यसनाधीनते मध्ये अडकलेल्या व्यक्तींना विशेष असे वर्तन करत असताना वेळेचे भान नसते व दैनंदिन कामकाजा कडे दुर्लक्ष होते. खूप कमी झोपणे, क्वचितच जेवणे, यामुळे झोपेचे आजार (निद्रानाश) व अशक्तपणा जाणवतो. मोबाइल किंवा इंटरनेट व्यसनाधीनच्या या आजारात एखादी व्यक्ती सहज अडकू शकते. सहजतेने व कमी खर्चात होणारी उपलब्धता, जगाशी जोडले असल्याचा गैरसमज किंवा भ्रम, इंटरनेट वापरामुळे मिळणारी उन्मादी आनंद, एकटेपणातून आलेले नैराश्य व चिंतेसारख्या भावनेतून दूर जाण्यासाठी, भावनिक आधाराची कमतरता, पालकांचे दुर्लक्ष किंवा अतिसुट इ कारणे असु शकतात. काही मुला-मुलींना  समाजात वावरताना जेंव्हा लोकांशी समोरासमोर बोलण्याची वेळ येते तेंव्हा शरमेची आणि न्यूनगंडाची भावना खूप असते. सोशल मीडिया च्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधने, मैत्री करणे इत्यादी प्रयत्न ते करतात व या व्यसनाधीनतेचे बळी पडण्याची शक्यता वाढते. मग सायबर क्राईम सारखे प्रकार पण यामध्ये घडू शकतात. 
           दक्षिण कोरिया मध्ये इंटरनेट व्यसनाधीनतेचे प्रमाण खूप वाढल्यामुळे "Jump Up Rescue School" सुरु करण्यात आले. तसेच २०११ मध्ये Shutdown Law व Cinderella Act काढण्यात आला. ज्यामध्ये रात्री १२.०० ते सकाळी ६.०० दरम्यान मुलांना ऑनलाईन गेम्स खेळण्यांपासून बंदी घालण्यात आली. अमेरिकेत इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र सुरु करण्यात आले. जागतिक आरोग्य संस्थेने विडिओ गेम्स च्या व्यसनाला ' मानसिक विकृती म्हणून घोषित केले आहे. १० ते १९ या वयोगटातील मुला - मुलींना हा आजार जास्त प्रमाणात असल्याचे आढळून आले आहे. इंटरनेटच्या व्यसनाधीनतेचा या मायाजालातून बाहेर पाडण्यासाठी त्वरित समुपदेशन व मनोपचारतज्ज्ञाची मदत घेणे आवश्यक आहे. काही वेळेस व्यसनाधिन व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींनासुद्धा समुपदेशनाची गरज भासते.
 ⇨ व्यसनात अडकलेल्या व्यक्तींना पुढील काळजी घेणे गरजेचे आहे:
१. प्रत्येकी एका तासाने १० मिनिटांचा ब्रेक घेणे व इंटरनेट वापराचा वेळ कमी करून ब्रेकचा वेळ वाढवणे (त्यासाठी अलार्म चा वापर करू शकता).   
२. बाथरूम, टॉयलेटला जाताना तसेच जेवतेवेळी / जेवताना मोबाईल दूर ठेवणे. 
३.  मोबाईलचा पॉप उप नोटिफिकेशन बंद ठेवणे.
४. घरामध्ये 'No Mobile Phone' क्षेत्र राखीव करणे इ. 
५. कंटाळवाणा वाटल्यावर आपण इंटरनेट किंवा गेम्स चा वापर करता का? एकटेपणा व नैराश्यातून सुटकेसाठी ऑनलाइन जाता का ? याची दक्षता ठेवणे.  
६. Digital Diet म्हणजे आपण योग्य त्या संकेतस्थळावर क्लिक करतो का? ते पाहणे. 
समुपदेशनासाठी संपर्क ....         

- Psychologist Amar Rathod.

Contact- https://manoracheta.co.in/Welcome/Psychologist

...

12-Apr-2023

मनो मैथुन

         भाव (अर्थ) भावना आणि कृती यांचा फार जवळचा संबंध आहे. हा लेख थोडा संवेदनशील आहे पण नक्कीच त्या संवेदनशील विषयाची माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवताना मी मनापासून प्रयत्न करेल आणि शक्य तेवढे शील पालन करेल आणि  कुठलीही अश्लील भावना वाचकांमध्ये उजागर न करण्याचा प्रयत्न करेल. सुरुवातीला मुद्दामच थोडं भाषा सामर्थ्य उलगडून बघुयात आपल्या जेष्ठ आजीबाई ‘संस्कृत’ यांच्याकडे अट्राक्शन (ATTRACTION) या शब्दासाठी आकर्ष, विलोभ, अनुकर्ष, पतनशीलता, कालधर्म असे १५ हून अधिक, तर सेक्स (SEX) या शब्दासाठी जात, रत, रति, काम्य, शुष्म, संभोग, ऋतु असे प्रचलित ५१ व त्याहून अधिक  समानअर्थी शब्द आहेत. लव (LOVE) या शब्दासाठी इष्ट, स्नेह, काम, रती, प्रेम इ. असे ८३ हून अधिक समानर्थी शब्द आहेत.

          एकूणच असे म्हणायला हरकत नाही की आजीबाई खूपच सुसंस्कृत आणि सुशिक्षित आहेत. पण हे फार मर्यादित वर्णन ठरेल या शब्दांना नुसते समानअर्थी शब्द नसून प्रत्येक शब्दाचे त्यांचे भाव/ अर्थ सुद्धा बरेच आहेत. जितके जास्त अर्थ तितक्या जास्त  भावनांच्या छटा आणि तीव्रतेचे स्तर सुद्धा. आणि या स्तरांवर आधारित जन्माला येते ती कृती.                                                                                                                                                                   मर्यादित अर्थासोबत समोर येते मर्यादित जाणीव आणि अल्प अर्थ कृती. तुम्हाला प्रश्न पडला असेल नक्की हे सगळं चाललं काय आहे? आकर्षण, प्रणय, प्रेम या शब्दांचा उल्लेख केला तेव्हा तुम्हाला काहीसा अंदाज आलाच असेल. आजही बरेच तथाकथित समजूतदार मोठे या विषयांवर बोलायला घाबरतात. पण प्रेम कथा, चित्रपट, प्रेम काव्य या रुपात लपून-छपुन या सर्व गोष्टींचा आस्वाद घेणं चालूच आहे. अशा धारणेच्या दबावा खाली की, या सर्वच गोष्टी लज्जास्पद आहेत. कारण मानवाने या भावनांचा अनुभव करणे अथवा व्यक्त करणे म्हणजे पाप आहे. प्रेम हि भावना अतिशय दैवी आहे, अतिशय शुद्ध आहे आणि लैंगिकता म्हणजे विकृत काही तरी. बघायला गेले तर या दोन्ही भावना एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. झाकलेल्या ज्ञानाला, वस्तूंला, गोष्टींना किंवा अतिदैवी गोष्टीना चोरण्याची वृत्ती वाढीस लागते अथवा आपण म्हणूया वाढीस लागली आहे. आज भारता सारख्या देशात  ७० टक्क्यापेक्षा अधिक इंटरनेट डेटा केवळ पॉर्न बघण्यासाठी वापरला जातो आणि सुरु होते ते मनो मैथुन. लपविलेले ज्ञान मिळविण्याच्या हट्टी हेतूने घडून आलेला बुद्धीविलास. नैतिकतेचा अवडंब करणारे म्हणतील, दोषारोपण करतील की, “शी-शी किती हो घाणेरडे लक्षण आहेत हो हे.” पण मुळ कारण मात्र कुणी शोधणार नाही कारण लैंगिकता या विषयावर बोलण्यापेक्षा कोणालाही त्या विषयाची ऊर्जा व महत्व समजावून सांगण्यापेक्षा त्या विषयाला घृणास्पद ठरवून, त्याचे विषयांतर काही तरी भयंकर गुन्हा केल्या सारखे करणे अधिक सोपे आहे.                                                                                        

           तरुणांमध्ये लैंगिक विषयांचे ज्ञान सरळ-सरळ न पोहोचवता त्याला लज्जा आणि गुन्हा केल्याची छटा दिली जाते कारण ते समजावणे जमत नाही हे पितळ उघडे पडले तर आम्ही जुने लोकं मोठे लोकं चार पावसाळे जास्त पाहिलेत या अहंकाराला मोठा धक्का बसेल. मग सुरु होतो तो चोरून लपून वासना शमन करण्याचा प्रवास. का हा विषय एवढा आकर्षणाचे केंद्र बनला आहे?

-  दुसर्या महायुद्धात छळ छावणीत अडकलेले मानसशास्त्रज्ञ डॉ. विक्टर फ्रँकल छावणीच्या दिवसांचे वर्णन करताना सांगतात की, तिथल्या वर्षांमध्ये अन्न हि एकमेव अशी गोष्ट होती ज्या गोष्टीमुळे आमच्या मनात लैंगिक भावना कधी तीव्र होऊ शकल्या नाही. कारण अन्नासाठी आम्हाला इतके तरसावे लागत होते की ते मिळावे आणि भूक भागावी एवढेच एक ध्येय उरले होते आणि हि भूक भागवण्यासाठी आम्ही ते अन्न बिछान्या खाली लपवायला शिकलो. विक्टर फ्रँकल पुढे जाऊन म्हणतात २० व्या शतकातील प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्रोईड जर छळ छावणीत अडकले असते तर त्यांनी हे विधान कधीच केले नसते की, मानवी जीवन हे लैंगिक ऊर्जेच्या आजू-बाजूला घुटमळत असते.’ मुळात फ्रोईड यांनी हे विधान विक्टोरीयन काळात केले जेव्हा युरोपातील स्त्रियांचे पाय दिसणे सुद्धा दिवसातले स्वर्ग सुख लाभल्यासारखे होते. जे ज्ञान त्या काळात दाबले गेले तेच ज्ञान चोरून शोधले गेले. आणि आजही २१ व्या शतकात त्याच गोष्टीची पुनरावृत्ती होते आहे. कुठल्याही विषयाचा वैज्ञानिक पैलू जो पर्यंत समजून येत नाही किंवा समजावला जात नाही. तो पर्यंत तो विषय चमत्कार, दैवी किंवा आश्चर्याचे कारण बनून जातो. आणि समजला नाही किंवा समजावता आला नाही की दूषण देण्याचे कारण ठरून जातो. हे शतक आज एका सुंदर वळणावर येऊन उभे ठाकले आहे जिथे माहिती तुमच्या बोटांच्या टोकावर नाचते आहे हजर होते आहे. मानवी धारणांना जाग करण्यासाठीचा आणि पडताळून बघण्यासाठीचा तर्क शक्तीला शुद्ध स्वरूप आणण्याचे हे सुवर्ण युग ठरू शकते. गरज आहे ती संवेदनशील विषयांवर योग्य मार्गदर्शनाची...                                                                                                                    

  • मनोविकास तज्ञ अजय बी. देशमुख.
  • संपर्क -  ८३८००९०४९८.

28 ‎August ‎2021

...

08-Apr-2023

आमच्या वेळी असं काही नव्हत बाई!

     पत्रा द्वारे येणारा संदेश आणि वॉटस अ‍ॅप मेसेज मधून येणारा संदेश आपल्याकडे येई पर्यंत जी आतुरता आपल्या मनात असते यातील संयमाचे अंतर म्हणजेच दोन पिढ्यांचे वैचारिक अंतर. या वैचारिक अंतराला हातभार लावते ती म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात तीव्रतेने वाढत जाणारी जटिलता. दैनंदिन जीवनातील जटिलतेला मिळती-जुळती सक्षमता कमवणे म्हणजे अर्थातच भावनिक स्थिरता असणे हे अगदी ग्राह्य मापदंड आहे.

     पण याचे प्रशिक्षण कुठे हो मिळते? कोणी आहे का हो SSS मदतीला? कोणी भावना जपण्याच प्रशिक्षण देत का? प्रशिक्षण? या हुशार , बुद्धीजीवी, व्यवसायात तीव्रतेने यशस्वी होणार्या तुफानाला कोणी प्रशिक्षण देतं का? प्रशिक्षण?...  खरंच हा प्रश्न कधी पडला का हो तुम्हाला? की भावनिक स्थिरतेच सुद्धा प्रशिक्षण असू शकत? की कायम हाच समज अगदी घट्ट पकडून होतो की बाहेरच्या जगात असे पुरेसे प्रसंग होतात की माणूस अपोआप भावनेचा प्रधान होऊन जातो. मग नक्की तो भावना प्रधान होतो की भावनिक कोरडा??? भावना प्रधान होतो की नाही हे नाही माहित पण भावनिक कोरडे पणा जपण्याचा त्याचा नित्य सराव चालू असतो. आणि यातच पुढची पायरी म्हणजे आमचा मुलगा किंवा मुलगी आता पुरेसे “सेट” आणि “समजूतदार” झाले आहेत आता हात पिवळे करायला हरकत नाही. पण…

     भावनिक कोरडेपणाचा अव्वल सराव झालेले हे “समजुतदार” लग्नाळू तरुण मुलं एकमेकांना आपल्या वैयक्तिक वर्तुळात येऊ देण्यासाठी तयार आहेत का? आणि जरी आलेच तर हे अनैसर्गिक भावनिक प्रशिक्षण त्यांना त्या नात्यामध्ये सुदृढ भावनांचा अनुभव घेऊ देईल? योग्य मार्गाने गेले तर नक्कीच, हा मार्ग दाखवणारे समुपदेशक नक्कीच तत्परतेने सिद्ध आहेत. समुपदेशकांकडे फक्त मानसिक अस्वस्थ व्यक्ती जातात असे म्हणणे साफ चुकीचे ठरेल. नक्कीच समुपदेशक मानसिकरित्या सुधृड व्यक्तींसाठी सुद्धा आहेत. वाढत्या घटस्फोट संख्येमुळे जोडप्यांना विवाहपूर्व व विवाहोत्तर समुपदेशक अतिशय लाभदायक ठरते ज्यामध्ये जोडप्यांमध्ये वाढणाऱ्या भावनिक तणावाचे योग्य वेळी निराकरण करणे शक्य होते. २१ व्या शतकात आजही अगदी व्यक्तिगत नात्यांना दुरुस्त करण्यासाठी कुणाची मदत लागू शकते हि संकल्पना न पचनी पडण्या सारखी आहे. ज्यांची मुले आज लग्नाच्या वयाची आहे ते पालक अवाक् होऊन म्हणतील “आमच्या वेळी असं काही नव्हत बाई!” पण लग्ना आधी मुला-मुलींचे सामाजिक आणि वैयक्तिक समायोजन कौशल्य समजून घेणे व त्याचे प्रशिक्षण घेणे अतिशय हितकारक ठरते. नंतर वाढत जाणार्या वादात्मक परिस्थिती पेक्षा काही दिवसांचे समुपदेशन सत्र नक्कीच वैवाहिक जीवनाचा पुढील प्रवास सुंदर करेल. एकत्र कुटुंबाचे एकूणच वातावरण नसल्याने आज समुपदेशक पालकांना हे सहाय्य व मार्गदर्शन नक्कीच करू शकतात व त्यातून एकूणच संपूर्ण कुटुंब सुखी व एकोप्याने राहू शकते. व जोडप्यांना एकमेकांना समजून घेण्याचे कौशल्य वाढीस लागेल.      

मनोरचेत: मानस आरोग्य सेवा, नाशिक.   

मनोविकास तज्ञ - अजय बी. देशमुख.

दिनांक - ‎20 ‎August ‎2021 

संपर्क८३८००९०४९८ 

...

07-Apr-2023

काय मनाची पॅथालॉजी लॅब?

           हो बरोबर, अगदी योग्य वाचले तुम्ही. मनाचीच पॅथालॉजी लॅब नक्कीच अचंभित व्हावं असा विषय आहे. पण या विषयी फार कमी लोकांना माहित आहे. मानसशास्त्रातील अनोळखी पण अतिशय उपयुक्त शाखा अगदी मानसउपचार करणाऱ्यांपासून ते सामान्य व्यक्ती सर्वांसाठीच. नक्की आहे काय? सोप्या शब्दात असं समजूया ज्या प्रकारे कुठल्याही शारीरिक आजाराचे निदान करताना शरीरातील घटक द्रव्यांचे पॅथालॉजी लॅबमध्ये मोजमाप केले जाते व येणाऱ्या संख्यांना अनुसरून आजाराची तीव्रता ठरवली जाते. त्याच प्रमाणे मानसिक व्याधींची तीव्रता ठरवण्यासाठी देखील चाचण्या आज एकविसाव्या शतकात उपलब्ध आहेत.                           

           या चाचण्यांची प्रक्रिया  बऱ्याच प्रमाणात पेपर पेन्सील वर आधारित आहेत ज्यामध्ये व्यक्ती स्वतः दिलेल्या प्रतिक्रियांची नोंद करते व त्यातून येणाऱ्या संख्यांना अनुसरून मानसिक व्याधींची तीव्रता समजते व उपचाराची दिशा ठरते. या चाचण्यांमध्ये बुद्धिमापन चाचण्या (शालेय मुलांची बुद्धीची क्षमता समजून घेण्यासाठी), अभिक्षमता चाचणी (विविध विषयामधील विद्यार्थ्याची क्षमता समजून घेण्यासाठी), वर्तन परीक्षण चाचण्या (विशिष्ठ परिस्थितीत व्यक्ती कोणत्या स्वरूपाचे वर्तन का करते हे समजून घेण्यासाठी), व्यक्तिमत्व चाचण्या (व्यक्तिमत्वातील घटक तसेच व्यक्तिमत्व विकृतीचे स्वरूप समजून घेण्यासाठी), समायोजन चाचण्या (विशिष्ठ ठिकाणी व्यक्ती कशा स्वरूपाचे समायोजन करते हे समजून घेण्यासाठी) अशा मानवी मानसिकतेचे व वर्तनाचे मोजमाप करण्यासाठी आज या मानसशास्त्रीय पद्धतीने बनविलेल्या चाचण्या सक्षम आहे तेही तुमच्या शरीराला कोणतीही सुई न टोचता. अगदी लहान बालकांपासून ते वयोवृद्धां पर्यंत सर्वांसाठी. मानसिक आजाराची तीव्रता न समजता बऱ्याच वेळा व्यक्ती चुकीच्या उपचार पद्धती किंवा मार्गांचा अवलंब करते. मानसिक असो किंवा शारीरिक आजार कुठलाही असला तरी तीव्रता समजून त्यावर उपचार घेणे नेहेमी योग्य ठरते. पूर्वनिदान हि उपचाराची पहिली पायरी आहे आणि त्यासाठीच मानसशास्त्रीय चाचण्या आपणास मदत करतात. हीच ती मनाची पॅथालॉजी लॅब.

मनोविकास तज्ञ अजय बी. देशमुख.

संपर्क८३८००९०४९८

दिनांक - 19 Aug 2021 

...

07-Apr-2023

सोनेरी शाबासकी

       सामाजिक उपक्रमांमध्ये म्हणा किंवा समुपदेशन सत्रांमध्ये म्हणा. पालकांच्या तक्रारी मला अगदी सारख्याच दिसून आल्या की , आमचा हा / ही यांना सारखा मोबाईल लागतो, कुणाशी लवकर बोलत नाही. फार कमी मित्र / मैत्रिणी आहेत. हुशार तर खूप आहे. आम्हाला सारखी काळजी असते की अभ्यासात दुर्लक्ष होत आहे , याची ही मोबाईलची सवय कशी घालवू , बर मोबाईल नाही दिला तर जेवणार नाही, चीड-चीड करेल. पाहुण्यांन समोर नीट वागणार नाही.''आम्ही किती लक्ष देणार ?!? आम्ही दिवसभर कामात असतो." असेही दिसून आले की वय वर्षे 9 ते 22 या वयोगटाबद्दल सांगताना, काळजी व्यक्त करताना पालकांचा विशेष पुढाकार दिसून आला. पालकांना आपल्या पाल्याविषयी त्यांचा भविष्याविषयी वाटणारी काळजी अगदी योग्य आहे. सगळ्या पालकांची ही एकच तक्रार प्रामुख्याने जाणवली की ," याच / हीच हे वर्तन सगळा त्या मोबाईल चा परिणाम आहे." या  एकाच वाक्यचं वारंवार मी निरीक्षण केलं.

    समुपदेशन सत्र जसे पालकांचे झाले तसेच मुलांचेही झाले. सत्रांदरम्यान मुलांसोबत चर्चा करताना हे जाणवले की , पालकांकडून भावनिक गरजांची पूर्तता वेळो-वेळी होत नाही. फक्त वस्तूंसंबंधी गरजा पुरवल्या जातात. वयात येण्याच्या काळात भावनिक प्रगल्भता किती महत्वाची भूमिका बजावते व तिचे मूळ कौटुंबिक वातावरणात कसे रुजते ???  आणि वैचारिक गोष्टींवर त्यांचा परिणाम या माहिती बद्दल अनेक पालक अनभिद्न्य दिसून येतात. अशा वेळी पालकांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन मुलांना समजून घेण्यास प्राध्यान देणे हे प्रथम गरजेचे ठरते आहे. सत्रानंमधून घडून आलेले निरीक्षण या मुद्द्यावर येऊन थांबले की, 'मोबाईलचा अतिवापर हा पालकत्वाच्या पद्धतीमुले दिसून येणारा परिणाम आहे.'  त्यातील काही निरीक्षणे पुढील प्रमाणे :

  1. पालकांमध्ये भावनिक उबेचा अभाव.
  2. मुलांमध्ये दुर्लक्षित होत गेल्याची भावना बळावणे.
  3. केलेल्या चुकांमुळे अथवा अपयशा मुळे मुलांना बऱ्याचदा टीकेला सामोरे जावे लागणे.
  4. जवळच्या व्यक्तीं मार्फत होणाऱ्या टीका, हेटाळणी होणे.
  5. पालकांच्याच कृत्याचे अनुकरण करणे ( मुलं शाब्दिक रित्या लवकर शिकत नाहीत तर  मोठ्यांच्या अनुकरणातून शिकतात.- इथे पालकांना स्वयंशिस्त राखावी लागणार.)

          पालकांमार्फत सतत शाब्दिक मार, बोलणे, रागावणे तुलना करणे. यातून मुलांमध्ये स्वाभाविकच बंड पुकारण्याची भावना निर्माण झाली नाही तरच नवल. आणि त्याला पर्याय म्हणून मोबाईल मार्फत मनोरंजनाच्या दुनियेत प्रवेश करणे ही निवड जास्त सोपी होते.

               आता प्रश्न पडला असेल की या मोबाईलचा आणि भावनांचा काय संबंध ???

        हे समजण्यासाठी पालकांनी थोडी निरीक्षण करण्याची तसदी घ्यावी. पाल्य मोबाईलमध्ये गेम खेळताना जेव्हा एखादा अवघड टप्पा पूर्ण करतो त्या वेळेस त्यांच्या चेहेऱ्याचे हावभाव निरीक्षण करा ते हाव-भाव तुम्हाला अगदी सहज पुढील निरीक्षण दाखवून देतील, जे शाब्दिक नसले तरी वर्तनात मात्र नक्की असेल. (1-हुरेरेरे, जिंकलो ... 2- हूश अवघड स्टेज क्लिअर झाली ... 3- अहा !!! मी हे करू शकतो ... जिंकलो की नाही  !!!? 4- मला आता पुढची स्टेज न हरता जिंकायला हवी, म्हणजे माझी रँकिंग वाढेल .मला स्टार मार्क मिळेल ,मला गोल्ड मार्क मिळवायचा आहे ...)

         या सगळ्या वाक्यानंमध्ये आता एकूणच दिसून येईल की, मुलं शब्दात न मांडू शकलेले संकेत/ भावना कशा प्रकारे प्रगट करतात. तसेच पालकांच्या वागणुकीचे प्रतिसाद मूल या खेळातून कसे व्यक्त करते तेही समजण्यास सोपे जाईल.

 

           क्रमश: मी हे वाक्य सांगतो आणि त्या मागचं गुपित सुद्धा , मग  पालकांना हे समजून घेण्यास सोपं होईल की माझ्या पाल्याला मोबाईल का एवढा आवडतो की प्रसंगी आमच्या सोबत पण भांडतात.

पालकांची वाक्ये

मुलांच्या भावनिक सुप्त प्रतिक्रिया

प्रतिक्रियांचा सुप्त अर्थ

* तुला ना एक गोष्ट नीट जमत नाही . मला वाटतच नाही तू काही करू शकशील...

1) हुरेरेरे , जिंकलो !!!

- मी काही मिळवू शकतो जिंकू शकतो एवढा मी प्रगल्भ आहे, सक्षम आहे. (सिद्ध केल्याची भावना)

* तुझ अजीबातच लक्ष नसत कशात , मी तुझा वयात होतो तेव्हा किती काम करुन सुद्धा अभ्यासात उत्तम होतो... माणसाने मन लावून काम कराव...

2) हूशsss , अवघड स्टेज क्लिअर झाली!!!

 

- या सगळ्यांना वाटतं मी अवघड काम करू शकत नाही , मी एकाग्र होऊ शकत नाही. शेवटी केलंच मी, यांना तरी जमेल का असं मस्त खेळायला ???(पालकांवरचा क्रोध + तुलना)

* शेजारच्या काका-काकूंचा मुलगा बघ किती वेग-वेगळ्या क्षेत्रात निपुण आहे , किती छान मार्क मिळाले त्याला , नाही तर तू , तुला काय जमत  ???

3) अहा !!! मी हे करू शकतो ... जिंकलो की नाही  !!!?

- बघा बघा माझ्या कोणत्याच मित्राला एवढ अव्वल खेळता येत नाही ... सारखे मला ऐकवता यांचा मुलगा बघ हे किती छान करतो , ते किती छान करतो , त्यांना जमेल माझ्या सारखं खेळायला ???(ईर्षा+तुलना)

* मला नाही वाटत याच्या कडून काही अपेक्षा ठेवावी, हा काही करेल असं मला दिसत नाही ...

4) मला आता पुढची स्टेज न हरता जिंकायला हवी, म्हणजे माझी रँकिंग वाढेल .मला स्टार मार्क मिळेल , मला गोल्ड मार्क मिळवायचा आहे ...

- मी पुढची स्टेज जिंकली म्हणजे मला मान मिळेल, मी सुद्धा कोणी तरी आहे याची जाणीव होईल इतरांना , मी किती उत्तम आहे हे मी सिद्ध करुन दाखवेल... मला शाबासकी मिळेल . "माझं कौतुक होईल..." (भावनिक उबेची ,कौतुकाची गरज असल्याचे प्रगट करणे , व फोल माध्यमातून ती साध्य करणे.)

 

         ‘’पालकवर्ग म्हणेल अहो पण हे फोल माध्यम आहे. एवढं पण समजत नाही का या मुलांना?’’             

     तुमची ही प्रतिक्रिया मी अगदी मनस्वी मान्य करतो आणि ते खरं सुद्धा आहे. पण, शाबासकी , जिंकल्यावर कौतुक, रंगीत स्क्रीन , हरल्यावर 'better luck next time' म्हणजे तू खेळत रहा यश तुझ्या वाटेवरच आहे तू प्रयत्न करत रहा असे प्रोत्साहन देणारी गोड-गोड भाषा पालकांच्या तुलनेत मोबाईल जवळ जास्त प्रमाणात आहे. मग आता मला सांगा मुलं कोणाला जास्त आपलंस मानतील ???

 * आपल्या ओळखीतील किती पालक मुलांनी यश संपादन केल्यावर जवळ घेऊन पाठ थोपटतात, कौतुक करतात ? (योग्य कृतीच कौतुक करा, फोल स्तुती नाही.)

* किती पालक मुलांशी त्यांच्या वयाचे होऊ त्यांचा समस्या दिवसातील फक्त 10 मिनिटं तरी ऐकतात ? (फक्त पालकांनाच कामात अडचणी येतात हा विचार बाजूला सारून, नुसते सल्ले देण टाळून?)      

* मुलं प्रामाणिकपणे घेत असलेल्या कष्टाना महत्व आहे असे किती पालकांना मनापासून वाटते ? आणि ते मुलांच्या जवळ व्यक्त देखील करतात ???

 * किती पालक मुलांचा वैचारिक कल्पना ऐकून त्यांना सुद्धा कुटुंब सदस्य असल्याची भावना देतात ?  "मला एक गोष्ट अडली आहे, मला मदत कर बर, तुझी काय आयडिया आहे ही समस्या सोडवायला, सांग बघू ?"

 *अपयश हाती आल्या नंतर आपल्या ओळखीतील किती पालक मुलांना जवळ घेऊन हे सांगतात की, ''नापास झालास अथवा अपयश आलं म्हणजे सगळंच संपून गेलं असं नाही, तू पुन्हा लढ आम्ही आहोत तुझा सोबत, तुझ्या जवळ, एक अपयश आलं म्हणजे तू माझा मुलगा / मुलगी नाहीस असं अजिबात सिद्ध होत नाही, अथवा तू कुचकामी आहे तुला काहीच जमणार नाही असही होणार नाही." किती हो मिनिटं लागतील या वाक्याना ?

       पालकांनी अंतर्मुख होऊन विचार करावा एवढाच माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. पालक संपूर्ण दोषी आहेत असं काही बिंबवण्याचा माझा अजिबात हेतू नाही. पण पालक म्हणून आपले शब्द आणि भावना कुठे तरी लपलेले आहेत , त्या भावना आणि शब्द शोधून मुलांसोबत वाटून घेतले तर नक्कीच बालक-पालक वर्गात भावनिक, वैचारिक आणि मानसिक बंध अधिक घट्ट होतील (त्यांना वस्तूंपेक्षा तुमची जास्त गरज आहे.) मोबाईलच्या आपुलकीला पराभूत करायचं असेल तर मानवी आपुलकीचा डोस वाढवावा लागणार आहे. शेवटी यंत्राच्या शाबासकी पेक्षा आपल्या जवळच्या माणसांची सोनेरी शाबासकी आयुष्य भर मनात साठवली जाते, आणि तिचं खऱ्या जगात पुन्हा आव्हानांना समोर जाण्यास बळ देते ..."

लेख संपवण्याच्या अखेरीस पालक वर्गाला जे स्वयंशिस्तीचे दिव्य साधावे लागणार त्या साठी काही टीप :

1) मुलांसमोर मोबाईलचा कमीत कमी वापर करा/ वापर टाळा.

2) टी.व्ही. वर शक्य होतील तेवढे माहिती देणारे चॅनेल लावा आणि जसा वेळ मिळेल तशा स्वरूपात मुलांसोबत प्रश्न विचारून चर्चा करा ( नॅशनल जिओग्राफी ,डिस्कवरी , डिस्कवरी सायन्स. इ. )

3) शारीरिक हालचाल होईल अशा स्वरूपाच्या खेळांची निवड करून मुलांना वेळ द्या.

4) बुद्दीबळ व तत्सम खेळांसाठी मुलांना प्रवृत्त करा, खेळा.

5) पालकांना व्यसन असल्यास ते मुलांन समोर करणे टाळा, आणि शक्य झाले तर त्यातून सुटका क रुन घ्या.

6) जेवताना टी.व्ही. बंद करणे.

 

7) स्वतः पालकांनी संग्राह्य पुस्तकांचे वाचन करणे, मुलांना वाचून दाखवणे, त्यांनाही अभ्यासा व्यतिरिक्त अवांतर वाचनास प्रवृत्त करणे.

8) आणि वरील सर्व गोष्टींना शिस्ती मध्ये सामावून घेणे अवघड वाटले. तरीही रोजचा संघर्ष आणि रोजचा त्या आळसावर विजय. हेच खरे दिव्य ठरेल...

              या वर पालकांनी गंभीर पणे विचार करणे, कारण तुमची मुले तुमच्या प्रत्येक कृतीच निरीक्षण करता आहेत आणि ते सवयीनं मध्ये सुद्धा आत्मसात करता आहेत. भावनिक रित्या पुरेपूर जागरूक असणाऱ्या व्यक्तींना मोबाईल ,किंवा त्यातील खेळ ही निवड करावी असे सहजा-सहजी वाटत नाही अथवा कामाच्या / अभ्यासाच्या प्राथमिकता (priority) अगदी सहज ठरलेल्या असतात. शेवटी समस्त पालक वर्गाला,

"VERY BEST OF LUCK..."

 

 

मनोविकासतज्ञ- अजय  देशमुख.

संपर्क - 8380090498 

दिनांक - 03/ 12/ 2019 

Subscribe to our latest updates

Get latest updates on our events and services with email newsletter.

connect image

Connect with us

You can reach to us and share your query by entering following details.

Copyright © 2023 Manorecheta. All rights reserved

+91 8380090498 +91 8380090498