हो बरोबर, अगदी योग्य वाचले तुम्ही. मनाचीच पॅथालॉजी लॅब नक्कीच अचंभित व्हावं असा विषय आहे. पण या विषयी फार कमी लोकांना माहित आहे. मानसशास्त्रातील अनोळखी पण अतिशय उपयुक्त शाखा अगदी मानसउपचार करणाऱ्यांपासून ते सामान्य व्यक्ती सर्वांसाठीच. नक्की आहे काय? सोप्या शब्दात असं समजूया ज्या प्रकारे कुठल्याही शारीरिक आजाराचे निदान करताना शरीरातील घटक द्रव्यांचे पॅथालॉजी लॅबमध्ये मोजमाप केले जाते व येणाऱ्या संख्यांना अनुसरून आजाराची तीव्रता ठरवली जाते. त्याच प्रमाणे मानसिक व्याधींची तीव्रता ठरवण्यासाठी देखील चाचण्या आज एकविसाव्या शतकात उपलब्ध आहेत.
या चाचण्यांची प्रक्रिया बऱ्याच प्रमाणात पेपर पेन्सील वर आधारित आहेत ज्यामध्ये व्यक्ती स्वतः दिलेल्या प्रतिक्रियांची नोंद करते व त्यातून येणाऱ्या संख्यांना अनुसरून मानसिक व्याधींची तीव्रता समजते व उपचाराची दिशा ठरते. या चाचण्यांमध्ये बुद्धिमापन चाचण्या (शालेय मुलांची बुद्धीची क्षमता समजून घेण्यासाठी), अभिक्षमता चाचणी (विविध विषयामधील विद्यार्थ्याची क्षमता समजून घेण्यासाठी), वर्तन परीक्षण चाचण्या (विशिष्ठ परिस्थितीत व्यक्ती कोणत्या स्वरूपाचे वर्तन का करते हे समजून घेण्यासाठी), व्यक्तिमत्व चाचण्या (व्यक्तिमत्वातील घटक तसेच व्यक्तिमत्व विकृतीचे स्वरूप समजून घेण्यासाठी), समायोजन चाचण्या (विशिष्ठ ठिकाणी व्यक्ती कशा स्वरूपाचे समायोजन करते हे समजून घेण्यासाठी) अशा मानवी मानसिकतेचे व वर्तनाचे मोजमाप करण्यासाठी आज या मानसशास्त्रीय पद्धतीने बनविलेल्या चाचण्या सक्षम आहे तेही तुमच्या शरीराला कोणतीही सुई न टोचता. अगदी लहान बालकांपासून ते वयोवृद्धां पर्यंत सर्वांसाठी. मानसिक आजाराची तीव्रता न समजता बऱ्याच वेळा व्यक्ती चुकीच्या उपचार पद्धती किंवा मार्गांचा अवलंब करते. मानसिक असो किंवा शारीरिक आजार कुठलाही असला तरी तीव्रता समजून त्यावर उपचार घेणे नेहेमी योग्य ठरते. पूर्वनिदान हि उपचाराची पहिली पायरी आहे आणि त्यासाठीच मानसशास्त्रीय चाचण्या आपणास मदत करतात. हीच ती मनाची पॅथालॉजी लॅब.
मनोविकास तज्ञ अजय बी. देशमुख.
संपर्क - ८३८००९०४९८.
दिनांक - 19 Aug 2021
07-Apr-2023