पत्रा द्वारे येणारा संदेश आणि वॉटस अॅप मेसेज मधून येणारा संदेश आपल्याकडे येई पर्यंत जी आतुरता आपल्या मनात असते यातील संयमाचे अंतर म्हणजेच दोन पिढ्यांचे वैचारिक अंतर. या वैचारिक अंतराला हातभार लावते ती म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात तीव्रतेने वाढत जाणारी जटिलता. दैनंदिन जीवनातील जटिलतेला मिळती-जुळती सक्षमता कमवणे म्हणजे अर्थातच भावनिक स्थिरता असणे हे अगदी ग्राह्य मापदंड आहे.
पण याचे प्रशिक्षण कुठे हो मिळते? कोणी आहे का हो SSS मदतीला? कोणी भावना जपण्याच प्रशिक्षण देत का? प्रशिक्षण? या हुशार , बुद्धीजीवी, व्यवसायात तीव्रतेने यशस्वी होणार्या तुफानाला कोणी प्रशिक्षण देतं का? प्रशिक्षण?... खरंच हा प्रश्न कधी पडला का हो तुम्हाला? की भावनिक स्थिरतेच सुद्धा प्रशिक्षण असू शकत? की कायम हाच समज अगदी घट्ट पकडून होतो की बाहेरच्या जगात असे पुरेसे प्रसंग होतात की माणूस अपोआप भावनेचा प्रधान होऊन जातो. मग नक्की तो भावना प्रधान होतो की भावनिक कोरडा??? भावना प्रधान होतो की नाही हे नाही माहित पण भावनिक कोरडे पणा जपण्याचा त्याचा नित्य सराव चालू असतो. आणि यातच पुढची पायरी म्हणजे आमचा मुलगा किंवा मुलगी आता पुरेसे “सेट” आणि “समजूतदार” झाले आहेत आता हात पिवळे करायला हरकत नाही. पण…
भावनिक कोरडेपणाचा अव्वल सराव झालेले हे “समजुतदार” लग्नाळू तरुण मुलं एकमेकांना आपल्या वैयक्तिक वर्तुळात येऊ देण्यासाठी तयार आहेत का? आणि जरी आलेच तर हे अनैसर्गिक भावनिक प्रशिक्षण त्यांना त्या नात्यामध्ये सुदृढ भावनांचा अनुभव घेऊ देईल? योग्य मार्गाने गेले तर नक्कीच, हा मार्ग दाखवणारे समुपदेशक नक्कीच तत्परतेने सिद्ध आहेत. समुपदेशकांकडे फक्त मानसिक अस्वस्थ व्यक्ती जातात असे म्हणणे साफ चुकीचे ठरेल. नक्कीच समुपदेशक मानसिकरित्या सुधृड व्यक्तींसाठी सुद्धा आहेत. वाढत्या घटस्फोट संख्येमुळे जोडप्यांना विवाहपूर्व व विवाहोत्तर समुपदेशक अतिशय लाभदायक ठरते ज्यामध्ये जोडप्यांमध्ये वाढणाऱ्या भावनिक तणावाचे योग्य वेळी निराकरण करणे शक्य होते. २१ व्या शतकात आजही अगदी व्यक्तिगत नात्यांना दुरुस्त करण्यासाठी कुणाची मदत लागू शकते हि संकल्पना न पचनी पडण्या सारखी आहे. ज्यांची मुले आज लग्नाच्या वयाची आहे ते पालक अवाक् होऊन म्हणतील “आमच्या वेळी असं काही नव्हत बाई!” पण लग्ना आधी मुला-मुलींचे सामाजिक आणि वैयक्तिक समायोजन कौशल्य समजून घेणे व त्याचे प्रशिक्षण घेणे अतिशय हितकारक ठरते. नंतर वाढत जाणार्या वादात्मक परिस्थिती पेक्षा काही दिवसांचे समुपदेशन सत्र नक्कीच वैवाहिक जीवनाचा पुढील प्रवास सुंदर करेल. एकत्र कुटुंबाचे एकूणच वातावरण नसल्याने आज समुपदेशक पालकांना हे सहाय्य व मार्गदर्शन नक्कीच करू शकतात व त्यातून एकूणच संपूर्ण कुटुंब सुखी व एकोप्याने राहू शकते. व जोडप्यांना एकमेकांना समजून घेण्याचे कौशल्य वाढीस लागेल.
मनोरचेत: मानस आरोग्य सेवा, नाशिक.
मनोविकास तज्ञ - अजय बी. देशमुख.
दिनांक - 20 August 2021
संपर्क - ८३८००९०४९८.
08-Apr-2023